शिवचरित्रमाला भाग ८८

शिवचरित्रमाला भाग ८८

======================

म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान

=====================

महाराजांच्या जीवनात लढाया अनेक. शत्रूकडील भुईकोट अन् गिरीकोट काबीज करण्यासाठी त्यांनी अनेक लढाया केल्या. पण एक गोष्ट लक्षात येते की , किल्ले घेताना ते एकदम आकस्मिक हल्ला करूनच घेण्याचे त्यांचे बेत असत. त्यांच्या संपूर्ण जीवनात किल्ल्याला वेढा घालून तो जिंकण्याचा प्रयत्न महाराजांनी अगदी बोटावर मोजण्याइतक्याच वेळी केला. मिरजेचा किल्ला घेण्यासाठी त्यांनी या भुईकोटाला दोन महिने वेढा घातला होता. जातीने ते वेढ्यात होते. (दि. २९ डिसेंबर १६५९ ते मार्च २ , १६६० ) सतत झुंजूनही हा भुईकोट त्यांना मिळाला नाही. अखेर त्यांनी मिरजेहून पन्हाळ्याकडे माघार घेतली. सेनापती नेतोजीने विजापूरच्याच भुईकोटावर सतत आठ दिवस हल्ले केले. शेवटी त्याला माघार घ्यावी लागली. येथे ‘ सरप्राइज अॅटॅक ‘ नेतोजीस जमला नाही.

 

इ. १६७७ तंजावर मोहिमेचे वेळी तामिळनाडूमधील वेल्लोरच्या भुईकोटास मराठी सैन्याने वेढा घातला. हा वेढा प्रदीर्घकाळ म्हणजे सुमारे एक वर्षे चालू होता. अखेर वेल्लोर कोट मराठ्यांनी काबीज केला. बस्स! वेढे घालण्याचे हे एवढेच प्रसंग. बाकी सर्व वेगवेगळ्या हिकमतीने कमीतकमी वेळात त्यांनी ठाणी जिंकलेली दिसतात. वेढे घालण्यात फार मोठे सैन्य प्रदीर्घ काळ गुंतून पडते. शिवाय विजयाची शाश्वती नसते. अन् एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांपाशी अशा वेढ्यांकरिता लागणारा तोफखाना कधीच नव्हता.

 

आता महाराजांच्या डोळ्यासमोर उभा होता गड पुरंदर. दि. ८ मार्च १६७० या दिवशी हल्ल्याचा बेत होता. निळो सोनदेव बावडेकर यांना महाराजांनी पुरंदरची मोहिम सांगितली. दि. ८ मार्चलाच सोनोपंतांनी पुरंदरावर छापा घातला. एकाच छाप्यात पुरंदर स्वराज्यात आला. लढाई झाली. पण जय मिळाला. मोगली किल्लेदार शेख रजीउद्दीन पराभूत झाला. मराठी सैन्यातील केशव नारायण देशपांडे हा तरुण लढताना मारला गेला. गड मिळाला. दि. ८ मार्च मुरारबाजी देशपांड्यांच्या पुरंदराला पुन्हा स्वराज्यात स्थान मिळाले. इथे एक गोष्ट लक्षात येते की , महाराजांनी सिंहगडापासून औरंगजेबाविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले. सिंहगड मिळाला. या घटनेने पुरंदरचा किल्लेदार शहाणा व्हावयास हवा होता ना ? पण पुरंदरही असाच झटकन मराठ्यांनी घेतला. किल्लेदार शेख पराभूत झाला. तो सावध नव्हता ? त्याचे कौशल्य किंवा हत्यार कुठे तोकडे पडले ? की मराठ्यांनीच अगदी वेगळाच काही डाव टाकून पुरंदर घेतला ? या लढाईची तपशीलवार माहिती मिळतच नाही.

 

महाराजांनी लगेच (मार्च १६७० ) इतर किल्ल्यावरच्या मोहिमाही निश्चित केल्या. इतकेच नव्हे तर स्वत:ही जातीने मोहिमशीर झाले. आखाडा मोठाच होता. तुंग , तिकोना अन् लोहगडापासून थेट खानदेश वऱ्हाडपर्यंत महाराज धडक देणार होते. निरनिराळ्या सरदारांच्यावर एकेका गडाची मोहिम महाराजांनी सोपविली होती. या प्रचंड आघाडीच्या अगदीच थोडा तपशील हाती लागला आहे. सर्वत्र मराठ्यांना विजय मिळत गेला , मिळत होते , हा त्याचा इत्यर्थ. मोरोपंत पिंगळ्यांनी त्र्यंबकचा किल्ला काबीज केला. हंबीररावर मोहित्यांनी नासिकच्या उत्तरेस मुसंडी मारली. ठरविलेले घडत होते. मोगली ठाण्यातून धनदौलत आणि युद्धसाहित्य मिळत होते. विजयाच्या बातम्या राजगडावर आणि स्वराज्यात सतत येत होत्या. यावेळी एक गंमत घडली. अत्यंत मार्मिक . पुरंदर घेतल्यानंतर महाराजांनी गडाच्या उत्तर बाजूचा मुलुख म्हणजे सामान्यपणे पुण्यापासून बारामतीपर्यंतच्या मुलुखावरती निळो सोनदेव बावडेकर (ज्यांनी पुरंदर काबीज केला) यांची मुलकी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. आज्ञेप्रमाणे ते कामही पाहू लागले होते. याच काळात मराठ्यांची ही उत्तर आघाडी सुरू झाली होती. विजयाच्या बातम्या हररोज येत होत्या. त्या या निळोपंत बावडेकरांनाही समजत होत्या. त्या ऐकत असताना निळोपंत अस्वस्थ होत होते का ? त्यांना असं वाटत होतं की , या नवीन तलवारीच्या मोहिमेत महाराजांनी आपल्याला घेतलं नाही. सगळे राव आणि पंत ठिकठिकाणी विजय मिळवीत आहेत तसा मीही तलवारीने मिळविला नसता का ? का घेतला नाही मला ? मुलखाची मुलकी कारकुनी मला का सांगितली ? अन् या म्हाताऱ्या बावडेकराची लेखणी मानेसारखीच थरथरली. त्यांनी महाराजांना या काळात लिहिलेले एक पत्र सापडले आहे. त्यांनी लिहिले आहे की , महाराज आपण स्वत: आणि राजमंडळातील अनेक समशेरवंत पराक्रमाची शर्थ करीत आहेत. ठाणी घेत आहेत. मोगलांकडील धनदौलत स्वराज्यासाठी मिळवीत आहेत आणि मला मात्र आपण लेखणीचा मनसुबा सांगितला आहे. मलाही समशेरीचा मनसुबा सांगावा. मीही चार ठाणी अन् चार सुवर्णाची फुले मिळवून आणीन.

 

म्हाताऱ्या बावडेकरांना बाळसं आलं होतं. त्यांचा उत्साह आणि आकांक्षा यांच्यापुढे गगन ठेंगणेसे झुकले होते. निळोपंतांचे वय यावेळी नेमके किती होते ते समजत नाही. बहुदा ते पंच्याहत्तरी च्या आसपास असावे असा तर्क आहे. वयाने थोराड असलेले असे त्यांचे दोन पुत्र यावेळी स्वराज्यात काम करीत होते. एकाचे नाव नारायण अन् दुसऱ्याचे रामचंद. असा हा निळोपंत न वाकलेला म्हातारा बाप्या माणूस होता. त्यांचे पत्र महाराजांस मोहिमेत मिळाले. ते वरील आशयाचे पत्र महाराजांस मिळाल्यानंतर त्यांना काय वाटले असेल ? आपली म्हातारी माणसेही केवढी उमेदीची आहेत ? यांचे पोवाडे गायला शाहीरच हवेत. यांच्या आकांक्षापुढे आभाळ बुटके आहे. अन् हेच स्वराज्याचे बळ आहे. महाराजांनी मायेच्या ओलाव्याने आणि कौतुकाने भिजलेले उत्तर निळो सोनदेव बावडेकरांना पाठविले. ते सापडले आहे. महाराज म्हणतात , ‘ लेखणीचा मनसुबा आणि तलवारीचा मनसुबा सारखाच मोलाचा आहे. कुठे कमी नाही. एकाने साध्य करावे , दुसऱ्याने साधन करावे. म्हणजेच ते सांभाळावे. ‘

 

खरं म्हणजे आता नव्या नव्या तरुणांनी नव्या मोहिमांवर मोहीमशीर व्हावे. फत्ते करावी. त्याचे जतन मागच्या आघाडीवर असलेल्या अनुभवी पांढऱ्या केसांनी करावे. आता जर तुम्हांसारख्या इतक्या वयोवृद्धांना आम्ही तलवारीची कामे सांगू लागलो तर ? जग काय म्हणेल ? महाराजांच्या पत्राचा हाच आशय होता. निळो सोनदेवही समजुतीचे शुभ्र होते. कलंक नव्हता. तेही समजले. उमजले. त्यांची लेखणी मुलकी कारभारात घोड्यासारखीच दौडत राहिली.

 

यानंतर एकाच वर्षाने (इ. १६७१ ) निळो सोनदेव बावडेकर वार्धक्याने स्वर्गवासी झाले.

 

… क्रमश.