शिवचरित्रमाला भाग ९५

शिवचरित्रमाला भाग ९५

======================

राजमाता – एक समर्थ नेतृत्व

======================

रायगडावर राजधानीच्या दृष्टीने अनेक बांधकामे सुरू झाली. हळूहळू पूर्ण होत गेली. त्याचवेळी रायगडच्या डोंगरवाटेवर निम्म्यावरती पाचाड येथे विशाल सपाटी पाहून महाराजांनी छान राजवाडा बांधला. वाड्याच्या भोवती चिरेबंद बुरुज आणि दोन भव्य दरवाजेही बांधले. पाचाड हे एक छोटेसे कोकणी खेडेगाव , या राजवाड्याच्या अगदी जवळच आहे. पाचाडातील लोकवस्ती शेतकऱ्यांची त्यात अनेक जातीजमातींची घरं , हा पाचाडचा वाडा महाराजांनी आपल्या आईकरिता बांधला. या वाड्याला आज जिजाऊसाहेबांचा वाडा असेच म्हणतात. आता हा पडून मोडून पडला आहे. तरीही त्याच्यावर सारेजण आदरपूर्वक प्रेम करतात. पाऊस काळात आणि थंडीत रायगडाच्या ऐन माथ्यावर हवा फार गारठ्याची असते. म्हणून या काळात आऊसाहेबांना मुक्कामाला हा वाडा सोईचा असे. महाराजही राहात.

 

इथं वाड्यात सर्व प्रकारच्या सोई महाराजांनी केल्या. त्यात एक विहीर चिरेबंदी बांधली. छोटीशीच. पण देखणी. पाचाडमधल्या गावकऱ्यांनाही पाणी न्यायला वापरायला ही विहीर मुक्त होती. या विहिरीच्या काठावर खेटूनच एक लहानसा चिरेबंदी ओटा बांधलेला आहे. त्यावर टेकून बसायला एक सुबक तक्क्याही बांधलेला आहे. तक्क्या अर्थात अखंड एका दगडाचाच. महाराज जेव्हा जेव्हा पाचाडला मुक्कामला असत , तेव्हा तेव्हा कधी सकाळी तर कधी मावळतेवेळी ते इथं या विहिरीवर तक्क्याशी बसत. गावातल्या आयाबाया पाणी भरायला विहीरीवर येत. कोणा कोणा बायांच्या संगतीला त्यांची लहानगी मुलं बोट धरून येत. महाराजांना ते फार आवडे. ते त्या लेकीसुनांची अतिशय आस्थेनं चौकशी , विचारपूस करीत. त्यांच्या लहानग्या पोरांना महाराज जवळ घेत आणि त्यांना काही खाऊ देत. हे महाराजांचं मायेचं वागणं औरंगजेबाच्या दरबारातील मोहम्मद हाशीम खाफीखान या तवारीखनवीसाला समजलं. त्याला नवल वाटलं. प्रजेतल्या बायकामुलांना हा राजा आपल्याच कुटुंबातल्या माणसांसारखं वागवितो याच त्याला मोठ आश्चर्य वाटल. बरोबर ही आहे. त्याने जे त्याच्या बादशाह कडे बघितल असेल, त्याच्या विपरीत चित्र होत न हे. हाच दोन संस्कृतीतला फरक. हे इथल्या मातीचे संस्कार.

 

 

कधी गडाच्या माथ्यावरील राजवाड्यात तर कधी पाचाडमधल्या राजवाड्यात जिजाऊ आऊसाहेबांचा मुक्काम असायचा. अखेर जिजाऊसाहेबांनी आपला शेवटचा श्वास याच पाचाडच्या वाड्यात सोडला. आऊसाहेब सर्वांशीच आईच्या मायेनं वागत असत असं उपलब्ध असलेल्या अस्सल कागदपत्रांवरून दिसून येतं. ही आई एखाद्या योगिनीसारखीच जगली आणि वागली. जयराम गंभीरराव पिंड्ये या नावाचे एक विद्वान कवी होते. ते मूळचे राहणार वणीच्या सप्तश्रृंगीच्या परिसरातील होत. त्यांनी लिहून ठेवलेले दोन ग्रंथ सापडले आहेत. त्यातील त्यांनी जिजाऊसाहेबांच्या बद्दल काढलेले उद्गार मननीयच आहेत. जयराम म्हणतात , जिजाऊसाहेब कशा आहेत ? ‘कादंबिनिव जगजिवनदानहेतु:! योगिनीप्रमाणे जगाला जीवन देणारी ही राजाची आई आहे. नव्हे जगाचीच आई आहे.

एका मराठी बखरांत जिजाऊसाहेबांच्याबद्दल म्हटलंय , की , ‘जिजाऊंसारखे कन्यारत्न ईश्वराने पैदा केले. ‘मोठेपणाचा अहंकार नाही. डागडागिन्यांचा सोस नाही. नात्या गोत्यातल्या कोणाचा मत्सर नाही किंवा कुणाचे फाजील लाडकौतुकही नाही. सवती मत्सर नाही.’

पुण्याजवळच्या आळंदी , देहू , सासवड , जेजुरी , चिंचवड , मोरगांव , शिखर शिंगणापूर , पाषाण अशा जवळजवळच्या तीर्थक्षेत्रांकडे त्यांचे लक्ष असे. त्यांच्या काही नोंदीही सापडल्या आहेत. त्यांनी देवाला दिलेली दानपत्रेही आहेत. शिखर शिंगणापूरच्या देवळाच्या बाहेर त्यांनी एक साधे पण भव्य प्रवेशद्वार (कमान) बांधले आहे. त्या कमानीच्या पायरीवर राजे भोसले. एवढाच दोन ओळीत त्यात मजकूर आहे. यातील संभाजीराजे भोसले म्हणजे जिजाऊसाहेबांचे थोरले पूत्र. आपल्या दोन मुलांच्या नावाने आऊसाहेबांनी ही कमान बांधली असा याचा अर्थ आहे. पाषाण येथील श्री सोमेश्वर महादेवाच्या मंदिराचा त्यांनी जीणोर्द्धारही केला. या मंदिराच्या सभामंडपात भिंतीवर सुंदर रंगीत पौराणिक चित्रे चितारण्यात आलेली होती. या चित्रांची थोडीफार प्रसिद्धीही महाराष्ट्र शासनाने केली. आता मात्र आम्ही मंडळींनी या मंदिराची सुधारणा करण्याच्या नादात ही चित्रे (म्युरल्स) चांगली ठेवलेली नाहीत. पाषाणच्या या सुंदर शिवमंदिराच्या पश्चिमेस तट , ओवऱ्या आणि पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांशेजारूनच ‘ राम ‘ नावाची एक छोटी नदी वाहते. या नदीच्या पात्रात सुंदर बंधारा आणि लकुंडे बांधलेली आहेत. हे सारेच प्रेक्षणीय काम जिजाऊसाहेबांच्या पुण्यातील वास्तव्य काळात (इ. १६३७ ते इ. १६४५ ) झालेले आहे. ही आई फार दूरदृष्टीची , विवेकी होती. याच काळातले त्यांनी न्यायासनावर बसून दिलेले न्यायनिवाडे अगदी समतोल आहेत. शेतकऱ्यांना आणि दारिद्र्याने होरपळलेल्या अन् शाही गुलामगिरीत पिचून निघालेल्या अनेक लोकांना आईने दिलेला मदतीचा हात म्हणजे भावी शिवशाहीच्या सुखी स्वराज्याची शुभचाहुलच होती.

 

जिजाऊसाहेब शिवाजीराजांना घेऊन पुण्यात आल्या , ( इ. १६३७ फेब्रुवारी) त्यावेळी आदिलशाही फौजांनी कसबा पुणे आणि इतर छत्तीस गावे फार चुरगाळून मुरगाळून टाकली होती. (इ. १६३२ ) त्यातच इ. १६३० आणि १६३१ चा भयंकर दुष्काळ पडला होता. त्यात कर्यात मावळाचं म्हणजेच पुणे प्रदेशाचंही भयंकर नुकसान झालं. या अस्मानी आणि सुलतानी संकटात संसार होरपळून निघाले. आऊसाहेब आणि राजे इ. १६३७ मध्ये पुण्याला आले आणि त्यांनी पुणे आणि परगणा पुन्हा स्थिरस्थावर करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या , त्या अभ्यासनीय आहेत. गरजवंत गावकऱ्यांना त्यांनी ‘ ऐनजिनसी ‘ मदत केली. म्हणजे शेती आणि अन्य बलुतेदारीतील व्यवसाय करण्याकरिता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता , असते , त्या गोष्टीच त्यांना दिल्या. म्हणजे बैल , मोट , शेतीची अवजारे इत्यादी. यामुळे बारा बलुतेदार व इतरही गावकरी आपापल्या उद्योगाला हौसेने लागले. रानटी जनावरांचा आणि चोराचिलटांचा बंदोबस्त केला. तेही काम त्यांनी गावागावच्या तराळ , जागले , येसकर , पाटील पटवारी यांच्यावर सोपविले. रानटी जनावरं म्हणजे वाघ , बिबटे , रानडुकरे , इत्यादींचा गावकऱ्यांनीच उपद्रव कमी करून टाकला. त्याबद्दलही या मंडळींना थोडेफार कौतुकाचे ‘शेपटामागे इनाम बक्षीस ‘ देण्यात येत होते. हा तपशील आणखीही मोठा आहे. जिजाऊसाहेबांच्या नेतृत्त्वाखाली ही लोकांच्या सोईसुखाची कामे त्यांनी केली. लोकांचेच सहकार्य त्यांत मिळविल्यामुळे पुणे परगणा ताजातवाना झाला. सहज मनांत येते की , आजच्या काळात आमच्या निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना , मग ते ग्रामपंचायतीचे असोत की विधानसभा अन् संसदेचे असोत , त्यांना या शिवशाहीच्या उष:कालात जिजाऊसाहेबांनी केलेल्या जनहितांच्या कार्यातून निश्चित मार्गदर्शन मिळू शकेल आणि प्रेरणाही मिळेल. शिवकालातील आऊसाहेबांचे आणि संस्थानी काळातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विधायक कार्य म्हणजे खरोखर महाराष्ट्राला अत्यंत उपयुक्त अशी लोकराज्यकारभाराची गाथाच आहे. पण लक्षात कोण घेतो ?

 

… क्रमश.