शिवचरित्रमाला भाग ९९

शिवचरित्रमाला भाग ९९

======================

एका बुंदेला राजपुताची गरुडझेप

======================

वणी दिंडोरीची लढाई लहानसान झाली नाही. ते युद्धच झाले. मोकळ्या मैदानावर झाले. इ. स. १६४६ पासून ते आत्ता १६७० पर्यंत. या पंचविशीत अनेक चकमकी झाल्या. अनेक जरा मोठ्या झटापटीही झाल्या. अनेक लढाया झाल्या , त्यात मोकळ्या मैदानावर काही लढाया झाल्या.

 

रुस्तुमे-जमा व फाझलखान यांच्याशी कोल्हापूरजवळ २८ डिसेंबर १६५९ रोजी झालेली कोल्हापूरची लढाई , ही मोकळ्या मैदानावरची होती. ती जिंकली. त्यानंतर अनेक छोट्या झटापटीही मावळ्यांनी फत्ते केल्या. पण वणी दिंडोरीच्या मोठ्या युद्धाने मोठाच बदल दिसून आला. आता आम्ही मोकळ्या मैदानावरही शत्रूच्या तिप्पट चौपट फौजांचाही पराभव करू शकतो , हे सिद्ध झाले.

 

याच आत्मविश्वासाने आपली युद्धपद्धती आणि युद्धनीती आपण चालविली , तर हरलेली राक्षसतागडी , फतेपूर सिक्री आणि हळदीघाटही आम्ही पुढे फत्ते करू असा आत्मविश्वास महाराजांच्या मनात आणि सैन्याच्याही मनात निर्माण झाला असेल तर नवल काय ? आमच्या घोड्यांच्या टापा गोदावरी ओलांडून उत्तरेच्या दिशेने पडू लागल्या. आम्ही सुरतेत तापीच्या तीरापर्यंत पोहोचलो.

 

आता नर्मदा , नंतर चंबळा , नंतर यमुना , नंतर गंगा , रावी , झेलम , सतलज अन् नंतर सिंधू ही आम्ही पार करू शकू , अन् अटक गाठू. हिंदुकुश ओलांडू , गांधारीच्या अन् शकुनीच्या गंधारपर्यंतही पोहोचू असा विश्वास मराठी बाळांच्या बाळमुठीत अन् मराठी जवानांच्या मनगटात प्रकटला असेल काय ? कारण याच काळात महाराजांनी सुरतेच्या मोगल सुभेदाराला लिहिलेले एक पत्र साडपले आहे. त्यात ते म्हणतात , ‘ तुमचे मोगली घोडे माझ्या मुलुखात पराभूत होत आहेत. माझ्या मुलुखाचे रक्षण मी करणारच. तुम्ही तुमच्या बादशाह औरंगजेब आलमगीर यांना तुमचे अनुभव अन् पराभव का कळवीत नाही ?’

 

महाराजांनी रावजी सोमनाथ पतकी सुभेदार यांस बोलून दाखविलेले मनोगत आज अस्सल कागदोपत्री उपलब्ध झाले आहे. महाराज म्हणतात , ‘ सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापर्यंत अवघा मुलुख (म्हणजे आसेतु हिमाचल भारतवर्षच) मुक्त करावा महाक्षेत्रे सोडवावीत ; ऐसा मानस आहे. ‘ केवढी आकांक्षा! केवढी महत्त्वाकांक्षा! केवढे विशाल स्वप्न! आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे!

 

याच काळात इ. स. १६७१ , पावसाळा , पण नक्की तारीख उपलब्ध नाही. एक उमदा बुंदेला राजपूत युवक ऐन पावसाळ्यात महाराजांना भेटण्याकरता आपल्या मूठभर सहकाऱ्यांनिशी मोगलाईतून महाराष्ट्रात आला. त्याचे नाव छत्रसाल चंपतराय बुंदेला. वास्तविक छत्रसालाच्या वडिलांनी आणि परिवाराने मोगल बादशाहीची तनमनधनपूर्वक लष्करी चाकरी केली. पण औरंगजेबाने चंपकरायचा अखेर विश्वासघाताने अंत केला. त्याचे घरदार , सर्वस्व जप्त केले. बुंदेल्यांचे हे राजघराणे अक्षरश: रस्त्यावर आले. ‘ पानी पिनेके लिए मिट्टीका बर्तनभी नहीं राहा! ‘ अशी त्याची अवस्था झाली. छत्रसालाच्या आईने आत्मार्पण केले. छत्रसाल निराधार होऊन उघड्यावर पडला. अखेर हा तरुण (वय अंदाजे १८ वषेर् असावे) मोगलांच्या सैन्यात शिपाईगिरीची नोकरी धरून कसा बसा जगू लागला. त्याच्या बायकोचे नाव किशोरीदेवी.

 

बुऱ्हाणपूर येथे मुघल सरदार खान जहाँ बहाद्दूर , बहाद्दूरखान कोकलताश याची छावणी होती. त्यातच छत्रसाल होता. सुमारे दीड वर्ष आधी ( इ. स. १६६८ सुमार) मोगलांनी दिलेरखानाच्या सेनापतीत्वाखाली , नागपूर , शिवणी , छिंदवाडा , देवगड वगैरे भागाचे गोंडवनी राज्य जिंकून घेण्याकरिता मोठी मोहिम काढली. यावेळी गोंडांचा राजा होता बख्तबुलंदशहा. त्याची राजधानी छिंदवाड्याजवळ देवगडच्या किल्ल्यात होती. हा गोंड राजा पूर्ण सार्वभौम स्वतंत्र होता. त्याची कुलदेवता होती दंतेश्वरी भवानी. ते संपूर्ण गोंडराज्य जिंकून घेण्याकरिता दिलेरखानची मोहिम सुरू झाली.

 

अखेर दिलेरखानाने जंगलमय अन् डोंगरमय भागात असलेला देवगड काबीज करण्यासाठी वेढा घातला. हा भाग अतिशय दुर्गम म्हणूनच अजिंक्य होता. दिलेरखान सुमारे सहा महिने झुंजत होता. पण त्याला देवगड मिळेना. तेव्हा देवगड काबीज करण्याचे काम त्याने छत्रसालावर सोपविले. छत्रसालाला आनंद झाला. वास्तविक आपल्याच एका स्वतंत्र गोंडराजाचे स्वराज्य बुडवून ते औरंगजेबाच्या घशात घालण्यचे पाप आपण करीत आहोत , याची जाणीव छत्रसालाला झालीच नाही. पराक्रमाची शर्थ करून देवगड छत्रसालाने जिंकला. राजा बख्तबुलंदशहा कैद झाला. औरंगजेबाचे निशाण छत्रसालाने फडकविले.

 

या महापराक्रमाबद्दल छत्रसालाला काय मिळाले ? त्याला हवी होती दिल्लीच्या दरबारातील मानाची सरदारकी. पण त्याला काहीच मिळाले नाही. औरंगजेबाकडून साधे शाबासकीचे पत्रही मिळाले नाही. मानपत्रही नाही. पुष्पगुच्छही नाही. शाल आणि नारळही नाही!

 

या प्रकाराने छत्रसाल भयंकर नाराज झाला. दिलेरखानानंतर नेमणूक झाली बहाद्दूरखान कोकलताशची. औरंगजेबाने मराठ्यांविरुद्ध या कोकलताशची योजना केली. तो बुऱ्हाणपुरास तळ देऊन बसला. त्यात छत्रसाल होता. पावसाळा सुरू झाला होता. तो संपेपर्यंत खान छावणीतच होता. अस्वस्थ असलेला छत्रसाल विचार करीत होता. त्याच्या मनात विचार आला की , आपण इथून गुपचूप शिवाजीमहाराजांकडे जावे आणि त्यांच्या पदरी सैन्यात राहून चाकरी करावी. नर्मदेच्या उत्तरेला असा भयंकर आत्मघातकी विचार महाराणा प्रतापांच्यानंतर याच एका तरुण राजपुताच्या मनात आला. एकमेव वेडा!

 

आणि शिकारीला जातो असे कारण सांगून छत्रसाल आपल्या मूठभर सहकाऱ्यांच्यानिशी भर पावसात बुऱ्हाणपूर छावणीतून बाहेर पडला आणि त्याने शिवाजी महाराजांचा मार्ग धरला. त्याला जंगलातून , चिखलातून आणि नद्यानाल्यातून जावे लागत होेते. खाण्यापिण्याचे आणि मुक्कामाचे फार हाल होत होते. काही वेळेला तर सापडलेल्या शिकारीचे मांस कच्चे खाण्याची वेळ त्याच्यावर व सहकाऱ्यांवर येत होती. त्या सहकाऱ्यांत लालजी पुरोहित उर्फ गोरेलाल तिवारी या नावाचा मित्र होता. मिळेल ते खाऊन अन मिळेल ती शिकार करून हे सारे वाट तुडवीत होते. फार हाल. खाण्यापिण्याचे , गोरेलाल तिवारीचे हाल तर फारच होत होते. छत्रसालाने गोदावरी ओलांडली , प्रवरा , भीमा , नीरा ओलांडून तो श्रीकृष्णा नदीच्या परिसरात प्रवेशला. त्याला बातमी मिळाली की , महाराज शिवाजीराजांचा मुक्काम कृष्णानदीच्या तीरावर छावणीत आहे. महाराजांची छावणी लांबवरून दिसू लागली.

 

… क्रमश.