शिवचरित्रमाला भाग ११२

शिवचरित्रमाला भाग ११२

======================

एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .

======================

नेताजी पालकर औरंगजेबाच्या हाती लागला तेव्हा नेताजीचा काका कोंडाजी पालकर , पुत्र जानोजी पालकर आणि नेताजीच्या दोन बायका याही शाही बंधनात पडल्या. नेताजीची आणखी एक बायको होती. ती मात्र निसटली. तिचे पुढे काय झाले , ते इतिहासास माहीत नाही. नेताजीला एक पुत्र होता जानोजी पालकर. त्याचे वय यावेळी फक्त तीन वर्षाचे होते. औरंगजेबाने या पकडलेल्या संपूर्ण पालकर कुटुंबाला धर्मांतरीत केले.

 

इ. १६६७ ते इ. १६७६ प्रारंभापर्यंत नेतोजी आणि जानोजी हे अफगाणिस्तानात मोगली छावणीत होते. नेतोजीच्या इतर कुटुंबियांचे काय झाले ते समजत नाही. दौंड ते अहमदनगर या रस्त्यावर काष्टी आणि तांदळी या नावाची दोन गावे आहेत. पालकरांचे घराणे इथलेच. शिवाजी महाराजांच्या एक राणीसाहेब. पुतळाबाईसाहेब यांचे माहेर पालकर घराण्यातील होते. पण नेतोजींचे आणि पुतळा बाईसाहेबांचे नेमके काय नाते होते , ते समजत नाही.

 

सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यांत वादळी पराक्रम गाजविणारा एक जबरदस्त योद्धा औरंगजेबाच्या तडाख्यात सापडल्यामुळे कुठल्याकुठे अफगाणिस्तानात फेकला गेला. पालकर घराण्याची एक शाखा नांदेड जिल्ह्यात आहे. परंतु नांदेड , काष्टी तांदळी , नागपूर इत्यादी ठिकाणी आज अस्तित्त्वात असलेल्या पालकर घराण्यांचे परस्परसंबंध काय होते ते कागदोपत्री सापडत नाही. अधिक संशोधनाची गरज आहे.

 

इ. १६७३ मध्ये काशी क्षेत्रातील एक थोर विद्वान पंडित काशीहून महाराष्ट्रात आला. या पंडिताचे नाव गंगाधरभट्ट उर्फ गागाभट्ट असे होते. त्यांचे आडनांव ‘ भट्ट ‘ हेच होते. हे विश्वामित्र गोत्री देशस्य ऋग्वेदी ब्राह्मण घराणे मूळचे पैठणचे. या घराण्यात परंपरेने अनेक ग्रंथ लिहिले गेले. बहमनी सुलतानांच्या प्रारंभकाळात हे घराणे पैठण सोडून बाहेर पडले. शेवटी हे स्थिरावले काशी क्षेत्रात श्रीगंगेच्या काठी.

 

गागाभट्ट हे महाराष्ट्रीय पंडित. ते शिवकाळात इ. स. १६६३ – ६४ या काळात काशीहून महाराष्ट्रात काही महिन्यांपुरते येऊन राहिले होते. शिवाजी महाराजांचा व त्यांचा परिचय त्याच काळातला. काही धार्मिक प्रश्नांच्या सोडवणुकीसंदर्भात शिवाजी महाराजांनी एक , धर्मशास्त्र जाणणाऱ्या विद्वानांची समिती नेमली. या समितीचे प्रमुखपद महाराजांनी सात वर्षे वयाच्या युवराज संभाजीराजे हे उत्तम संस्कृतज्ञ भाषापंडित झाले. संभाजीराजांनी पुढे बुधभूषण , नायिकाभेद आणि आत्मचरित्र कथन करणारे एक विस्तृत संस्कृत दानपत्रही लिहिलेले उपलब्ध आहे.

 

संभाजी महाराजांची पुढच्या काळात जयपूरच्या महाराजा रामसिंगला लिहिलेली संस्कृत भाषेतील पत्रेही सापडलेली आहेत. म्हणजेच युवराज संभाजीराजांच्या अभ्यासू वृत्तीचा प्रारंभ इतक्या लहानपणी शिवाजी महाराजांनी करून दिलेला दिसतो. त्यातून महाराजांचे आपल्या पुत्राच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे किती लक्ष होते , हे ही लक्षात येते. युवराज संभाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल काही बखरकारांनी व दंतकथा लेखकांनी पुढच्या काळात किती विपरित चित्र रंगविले हे पाहिले आणि संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतील हा अभ्यासप्रवास पाहिला की , सारे गैरसमज आपोआप विरघळून पडतात.

 

गागाभट्ट महाराष्ट्रात आले ( इ. १६६३ – ६४ ) त्यावेळी त्यांनी काही धार्मिक , सामाजिक समस्यांवरती जे लेखन केले आणि धार्मिक निर्णय दिले , ते आज उपलब्ध आहेत. तसेच इ. १६७३ पासून पुढे त्यांचे जे काही वास्तव्य स्वराज्यात घडले , त्याही काळात त्यांनी काही ग्रंथ लिहिले , राज्याभिषेक प्रयोग , शिवाकोर्दय , समयनय हे ग्रंथ त्यापैकीच होत. समयनय हा ग्रंथ उपदेशात्मक संस्कृत भाषेतील आहे. तो सुभाषितांसारख्या वचनांनी परिपृत आहे.

 

*गागाभट्ट हे शिवाजीमहाराजांच्या दर्शनासाठी येत होते. मूळ नोंदीत ‘दर्शन’ हाच शब्द वापरला आहे. त्यावरून त्यांच्या मनात महाराजांचेबद्दल असलेली केवळ आदराचीच नव्हे, तर भक्तिची भावना ही व्यक्त होते.*

 

काशी क्षेत्रातील या भट्ट घराण्याची वंशावळ उपलब्ध आहे. गागाभट्ट हे बहुदा अविवाहित वेदाभ्यासी आणि पारमार्थिक जीवनच जगले , असे दिसते. त्यांनी लिहिलेल्या संस्कृत प्रकांड गंथांची यादी बरीच मोठी आहे. त्यांना काशीक्षेत्रातील विद्वत् मंडळात अग्रपूजेचा मान होता. श्री काशीविश्वनाथ आणि श्री बिंदुमाधव ही दोन दैवते त्यांची आराध्यदैवते होती. असे हे मूळ महाराष्ट्रीय पैठणचे पंडित कमीतकमी दहा वर्षे आधीपासूनच महाराजांच्या परिचयाचे होते. ते आता महाराजांच्या दर्शनासाठी रायगडची वाट चालत होते.

 

… क्रमश.