झुंज : भाग १६

झुंज : भाग १६

 

आपला सर्वात खास पराक्रमी योद्धा, सैय्यदशाला आलेला असा मृत्यू फतेहखानाच्या जिव्हारी लागला. खरे तर सैय्यदशाला मरण्याआधी तलवार काढण्याचीही संधी मिळाली नाही हेच मुळी त्याच्या पचनी पडत नव्हते. मुगल तुकडीच्या मागावर गेलेले तीनही शिपाई त्याच्या समोर मान खाली घालून उभे होते. त्याने परत त्यांना विचारले.

“क्या सब मारे गये?”

“जी हुजूर…” खाली मानेनेच तिघांमधील एक जण म्हणाला.

“सैय्यदशा के बारे में बताव…”

“हुजूर… जब हम वहां पहुचे, तो सैय्यदशा का जिसम पडा हुवा था. उनकी समशेर भी मियानमे ही थी. पर उनके जिसमपर सिर नही था…” काहीसे बिचकत त्याने सांगितले.

“अगर सिर नही था तो वो सैय्यदशा था या कोई और ये तुमको कैसे मालूम?” काहीसे संतापाने खानाने विचारले.

“हुजूर… उनके कपडोंसे…” त्याने उत्तर दिले आणि खान विचारमग्न झाला. सैय्यदशाने बरोबर घेतलेला प्रत्येक जण कसलेला योद्धा होता आणि युद्ध न करताच त्यांच्यावर ही वेळ आली होती.

मुगल सैन्यात जेव्हा ही बातमी समजली तेंव्हा त्यांच्यात हळूहळू कुजबुज सुरु झाली. प्रत्येक जण या घटनेला वेगवेगळे रंग देऊ लागला. त्यातच अनेक अफवाही निमार्ण झाल्या. कुणी म्हणत की गडावरील किल्लेदार जादुगार आहे. कुणी म्हणे त्याने भूत प्रसन्न करून घेतले आहे. मुगल सैन्यातील जे लोकं हिंदू होते त्यांनी याचा संबंध एकदम रामाशी जोडला होता. त्यांच्या मते स्वतः रामराया गडाचे राखण करतो आहे. याचा परिणाम असा झाला की मुगल सैन्यातील अनेक अधिकारी मोहिमेवर जाण्यास टाळाटाळ करू लागले. अनेक जण हे आपण माणसाशी लढू शकतो, भूतांशी नाही हे खाजगीत बोलू लागले.
रोज कोणती ना कोणती नवीन वावडी खानाच्या कानावर येऊ लागली. हे सगळे थांबवणे खूप गरजेचे झाले. एकदा का सैन्याने माघार घेतली तर एकटा खान काहीही करू शकणार नव्हता. शेवटी याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावायचे खानाने ठरवले.

परत एकदा सभा भरली. यावेळेस खानाने फक्त सगळ्यांचे ऐकून घ्यायचे ठरवले.

“हुजूर… गुस्ताखी माफ…” एका अधिकाऱ्याने काहीसे बिचकत सुरुवात केली.

“हां… बोलो… क्या बोलना है…”

“हुजूर… सब केहेते है…” इतके बोलून तो थांबला…

“हां… बोलो…”

“हुजूर… वो किलेदार है ना, उसने भूत को प्रसन्न किया है…” एका दमात त्याने वाक्य बोलून टाकले.

“क्या बकते हो?” खान संतापला.

“हुजूर… मै नही, बाकी सब बोलते है…” अधिकारी पुरता गडबडला.

“गधे है सब… भूत, जिन्न ऐसा कुछ नही होता… सब वहम है… इतना भी तुम्हे पता नही?” खान भडकला.

“गुस्ताखी माफ हुजूर… पर…” अधिकारी बोलायचे थांबला.

“पर क्या?”

“हुजूर… आप ही सोचो… हमने क्या क्या नही किया… पर हर बार हमारा ही नुकसान हुवा… सरदार शहाबुद्दीनखान ने इतना बडा दमदमा बनाया था… दोन दिन मे खाक हो गया… हम शामतक किलेकी दिवार तोडते है, सुबह वो वैसी की वैसी दिखाई देती है. हमारे तीनसौ लोग रात के अंधेरेमे वहां गये और उनको लडना भी नसीब नही हुवा. वो किलेदार तो रात के अंधेरेमे भी साफ साफ देखता है और हमपे हमला भी करता है. हमारे सात हजार सिपाही मरते है और उनका एक भी आदमी नही मरता… सबको पता है किलेपर एक भी तोप नही है पर तोप के गोले हमपर गिरते है. और उसकी आवाज भी नही आती. क्या ये कोई आम आदमी कर सकता है?”

अधिकाऱ्याचे बोल ऐकून खानही विचारात पडला. आतापर्यंतच्या सगळ्या घटना पाहिल्या तर त्या अविश्वसनीयच होत्या. कडव्या राजपुतांचे बंड मोडून काढणारा शहाबुद्दीन खान दोन वर्ष प्रयत्न करूनही यशस्वी झाला नव्हता. स्वतः फतेहखान देखील काही महिन्यांपासून किल्ला मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पण परिणाम शून्यच.

“ठीक है… अब?” खानाचा स्वर मवाळ बनला.

“हुजूर… नासिकमे ऐसे बहोत मांत्रिक है… अगर उनकी मदत ली तो?” अधिकाऱ्याचा स्वर बदलला.

“लेकीन मुझे अबभी लगता है… भूत या जिन्न नही होते…” यावेळेस बोललेले खानाचे वाक्य अगदीच गुळमुळीत होते.

“हुजूर… इतना किया है तो ये भी करके देखते है…” दुसरा अधिकारी काहीसा शूर बनला.

“ये भी ठीक है… बुलाव फिर…” खानाने परवानगी दिली आणि सभा संपली.
दोन दिवस खान आणि तोफखाना दोन्ही शांतच होते. नेहमीप्रमाणे त्याचा शामियान्यात फेऱ्या घालण्याचा उद्योग चालू होता आणि तेवढ्यात हुजऱ्या आत आला. खानाला लवून कुर्निसात करत त्याने सैन्य अधिकारी भेटायला आल्याची वर्दी दिली.

“अंदर भेजो…” हुजऱ्याकडे लक्षही न देता खानाने हुकुम सोडला. काही वेळातच जवळपास तीन सैन्य अधिकारी आणि एक मांत्रिक खानापुढे हजर होते.

खानाने मांत्रिकाकडे निरखून पाहिले. काळी कफनी, गळ्यात कवड्यांच्या आणि पोवळ्यांच्या माळा, कपाळी काळे गंध आणि हातात मोरपिसांचा झाडू घेतलेला मांत्रिक उभा होता. मध्येच त्याचे डोळे फिरवणे, तोंडाने समजणार नाही असे काहीतरी बडबडणे आणि मधूनच हातवारे करणे चालू होते. त्याचा तो अवतार पाहूनच खानाचा पारा चढला. असे लोकं फक्त पैसे उकळतात इतकेच त्याला माहित होते. पण त्याने महत्प्रयासाने स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवले. ही गोष्ट त्याला स्वतःला जरी पटणारी नव्हती तरीही मुगल सैन्याच्या भीतीवर काही प्रमाणात मलमपट्टी ठरणार होती. आणि तोच विचार करून त्याने मांत्रिकाला बोलावले होते.

क्रमशः