झुंज : भाग २१

झुंज : भाग २१

 

दोन दिवसांनी किल्लेदार रामशेजवर पोहोचला. आल्या बरोबर त्याने आपल्या पत्नीला छत्रपतींच्या भेटीचा वृत्तांत कथन केला. तसेच लगेचच नवीन किल्लेदाराच्या ताब्यात गड देऊन सरनौबत हंबीरराव मोहित्यांच्या मदतीला जाण्याचे छत्रपतींचे फर्मानही सांगितले. आपल्या पतीला मिळालेला हा बहुमान पाहून त्याची पत्नीचे उर अभिमानाने भरून आले. ही बातमी काही क्षणातच संपूर्ण गडावर पसरली. ज्याच्या त्याच्या तोंडी संभाजी महाराजांनी केलेल्या किल्लेदाराच्या बहुमानाचाच विषय होता. खरे तर दर चार सहा वर्षांनी किल्लेदार बदलत होता. कित्येक वेळेस तर एक किल्लेदार एका ठिकाणी फक्त काही महिनेच अधिकारी म्हणून काम बघत असे. त्यामुळे गडावरील लोक आणि किल्लेदार यांच्यात सहसा तितका जिव्हाळा दिसून येत नसे. पण इथे मात्र चित्र पूर्णतः बदलले होते. किल्लेदारावर प्रत्येक जण जीव ओवाळून टाकत होता. त्याने तसा सगळ्यांनाच लळा लावला होता. एकीकडे किल्लेदारावर छत्रपतींनी टाकलेल्या विश्वासाचा अभिमान आणि दुसरीकडे यामुळेच होणारी त्यांची ताटातूट. आणि हेच कारण होते की प्रत्येक जण एकच विषय बोलत होता.

किल्लेदार आल्याच्या तिसऱ्याच दिवशी नवीन किल्लेदार गडावर हजर झाला. हा नवीन किल्लेदार जुन्या किल्लेदारापेक्षा वयाने काहीसा लहान होता. नवीन दमाचा. सहा फुट उंच, सावळा रंग, रुंद बांधा आणि सरदार म्हणून शोभू शकेल असा तरणाबांड गडी.

जुन्या किल्लेदाराने त्याचे खुल्या दिलाने स्वागत केले. परत एकदा सभा बोलवली गेली.

“गड्यांनो… आपलं राजं म्हंजी देवाचाच अवतार… त्यांच्याच आज्ञेनं आपन ह्यो गड बादशाला मिळू दिला नाई. शेवटी त्योबी त्रासला आन येढा सुटला. पन त्याचा काय भरोसा नाय. त्यो अवरंगाबादला तळ ठोकून हाये. त्याचा कोनचा बी सरदार कदीबी परत हमला करू शकतो. म्हनून आपन सावध ऱ्हायला पायजे. धाकल्या म्हाराजांनी मला इजापूरच्या मोहिमेवर जायला सांगितलं हाये. माह्या जागी ह्ये नवीन किल्लेदार आता गडाचं राखन करनार हायेत. तवा जी मदत तुमी मला केली तीच मदत यांना बी करायची हाये. आपन समदे स्वराज्याची रयत. याचपायी आपन जीव द्यायला बी तयार असलं पायजेल. पुना आपली भेट हुईल, ना हुईल… पन जवर बादशा हितं हाय तवर आपली झुंज संपलेली नाई… ह्ये समद्यांनी ध्यानात ठिवा आन आमचा रामराम घ्या…” इतके बोलून किल्लेदार उठून उभा राहिला. अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

“हर हर महादेव…” असंख्य घोषणांनी वातावरण दुमदुमले.

दुसऱ्याच दिवशी किल्लेदाराने गडावरील आपला गाशा गुंधाळला. गडाच्या चाव्या नवीन किल्लेदाराच्या स्वाधीन केल्या. बरोबर काही निवडक स्वार आणि आपला कुटुंबकबिला घेऊन किल्लेदार रामशेजचा गड उतरू लागला.

रामशेजच्या किल्लेदाराने गड सोडून जवळपास ४/५ महिने झाले होते.

औरंगजेब बादशहाचा दरबार भरला होता. प्रत्येक ठिकाणचे हेर येऊन बादशहाला बातम्या देत होते. आज बादशहा जरा खुश होता आणि त्याचे कारण म्हणजे कोकणातील अनेक मोहिमेत त्याच्या फौजांनी चांगली कामगिरी केली होती. आणि एवढ्यात एक हेर त्याच्या पुढ्यात आला. बादशाहाला त्याने लवून कुर्निसात केला.

“क्या खबर है?” बादशहाने विचारले.

“हुजूर… त्रंबकगडके किलेदारको संबाने वापस बुलाया है…” त्याने खबर दिली आणि त्रंबकचे नांव ऐकताच बादशहाला रामशेजची आठवण झाली. मध्यंतरीच्या काळात त्याला या गडाचा पूर्णतः विसर पडला होता. तसे त्याला तिथे नवीन किल्लेदार आल्याचे समजले होते पण कुतुबशाहीचा पूर्ण बिमोड करण्यासाठी त्याने या बातमीकडे जरासे दुर्लक्ष केले होते. त्याचे डोळे आनंदाने चमकले. ज्याने रामशेज झुंजवला तोही बदलला होता आणि त्याला मदत करणारा त्र्यंबकचा किल्लेदार देखील बदलला म्हटल्यावर त्याच्या मनात परत एकदा रामशेजची जखम ताजी झाली.

“इखलास खान…” त्याने इखलास खानाला आवाज दिला.

“जी जहांपना…”

“तुम दस हजार फौज लेकर रामशेज जाव… जो भी हो… जैसे भी हो… रामशेजपे अपना चांदसितारा फडकाना…”

“ऐसा ही होगा जहांपना…” तलवारीच्या मुठीवर हात ठेवत खान उद्गारला.

“ये बात तो शहाबुद्दीन खान, फतेहखान और कासम खान भी बोला था… पर हुवा क्या? सबको खाली हाथ लौटना पडा… इसलिये अब मुझे सिर्फ फतेह चाहिये…” बादशहा काहीसा उखडला. कारण हेच वाक्य तो चौथ्यांदा या छोट्याशा किल्ल्याबद्दल ऐकत होता. शहाजहानने आपली कारकीर्द हाच किल्ला जिंकून सुरु केली होती आणि तोच किल्ला औरंगजेबाला घेता येत नव्हता.

दहा हजारांची फौज घेऊन इखलासखानाने रामशेजच्या तळाशी आपले ठाण मांडले. खरे तर रामशेज साठी ही गोष्ट नवीन राहिलेली नव्हती. त्यामुळे आलेल्या नवीन किल्लेदाराने तेच धोरण स्वीकारले जे पहिल्या किल्लेदाराने स्वीकारले होते. अनेक दिवस झाले पण इखलासखानाला यश मिळत नव्हते. अजून काही दिवसांनी आपली देखील बादशहाकडून खरडपट्टी काढली जाणार या एकाच गोष्टीची त्याला चिंता वाटत होती. तेवढ्यात त्याच्या मनात विचार आला. किल्लेदार तर बदलला आहे. मग पुन्हा पहिल्या पासून सुरुवात केली तर? काय हरकत आहे? कोणताही विलंब न करता त्याने त्या योजनेचे पहिले पाऊल टाकले.

क्रमशः