शिवचरित्रमाला भाग १४

शिवचरित्रमाला भाग १४

 

मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला

 

याच कोकण स्वारीतून (इ। स. १६५७ – ५८ ) शिवाजीराजे कुडाळपर्यंत समुद आणि भूमी कब्जात घेत पोहोचले होते. देशावरीलही लोणावळ्याजवळच्या अनेक किल्ल्यांचा कब्जा राजांनी घेतला होता. राजमाची , लोहगड , तुंगतिकोना आणि पूवीर् शहाजीराजांच्यासाठी बादशाहच्या ताब्यात देऊन टाकलेला कोंढाणा राजांनी काबीज केला होता. कोकणातील पण सह्यादीवर असलेले माहुली , कोहजगड , सिद्धगड , मलंगगड , सरसगड , इत्यादी गडही जिंकले होते. स्वराज्य वाढलं होतं.

 

विजापूरचा अर्धांगवायू झालेला बादशाह मोहम्मद आदिलशाह चार नोव्हेंबर १६५६ रोजी मृत्यू पावला होता आणि त्याचा मुलगा अली आता बादशाह झाला होता। हा अली वयाने १७ – १८ वर्षांचाच होता. त्याची आई ताजुल मुख्खदीरात उर्फ बडीसाहेबा हीच सर्व कारभार पाहत होती.

 

क्वचितच एखाद्या झटापटीत स्वराज्याच्या मावळी सेनेचा पराभव होत होता। नाही असं नाही. पण उल्लेख करावा असा एकही विजय या काळात आदिलशाही सेनेला कुठेही मिळाला नाही. सर्वत्र विजयाचाच घोष उठत होता मराठ्यांचा. त्यामुळे आधीच हादरून गेलेल्या विजापूरच्या शाही दरबारची अवस्था चिंताक्रांत झाली होती. खरं म्हणजे ही विजयाची गगनभेदी गर्जना साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर एकदम उठली होती. हीच शिवक्रांती सगळीकडेच परकीय शत्रू विस्मित आणि बेचैन झाले होते. स्वकीय शत्रूंना काय तोटा ? त्यांचं पोट सततच दुखत होतं. राजांच्या या सुसाट कोकण स्वारीमुळे (इ. स. १६५७ – ५८ ) आदिलशाही गलबलून गेली होती. शिवाजीविरुद्ध काय करावं हेच बड्या बेगमेस आणि शाहास समजत नव्हतं. विचार करीत बसायलाही सवड नव्हती. सतत मराठी वादळाच्या बातम्या येत होत्या.

 

या मराठी विजयांचं मर्म कोणचं होतं ? का जय मिळत होते ? असं कोणचं ‘ मिसाईल ‘ महाराजांना गवसलं होतं ? आम्ही तरुणांनी आज याचा अभ्यास केला पाहिजे. महाराजांनीच अनेक प्रसंगी स्वत: उद्गारलेल्या शब्दांत ते मर्म सापडले. ते आपल्या मावळ्यांना म्हणताहेत.

 

‘ आपापले काम चोख करा ‘, ‘ हे राज्य श्रीच्या आशीर्वादाचे आहे ‘, ‘ पराक्रमाचे तमाशे दाखवा ‘, ‘ या राज्याचे रक्षण करणे हा आपला फर्ज (कर्तव्य) आहे , त्यांस चुकू नका। ‘ सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो अवघा मुलूख आपला. तो मुक्त करावा , ऐसा मानस आहे.

 

आणि असेच कितीतरी वर्मी भिडवित असे शब्द महाराजांनी आपल्या जिवलगांच्या पाठीवर हात ठेवून आयुष्यभर उच्चारले। हे शब्द हृदयी कोरूनच मावळ्यांनी स्वराज्याकरता सर्वस्व पणाला लावले. अनुशासन , शिस्त , निस्वार्थ सेवा , स्वच्छ राज्यकारभार आणि नेत्यांवरती नितांत विश्वास हे शिवशाहीच्या यशाचे मर्म होते. म्हणूनच हरघडी , हरदिवशी , नित्यनवा दिन जागृतीचा उगवत होता. मावळ्यांच्या आकांक्षापुढति गगन रोज झुकत होतं , ठेंगणं ठरत होतं. त्यातूनच भरत होतं स्वराज्य आणि बहरत होते स्वाभिमानी संसार. आळस , अज्ञान , अन् अहंकार यांची हकालपट्टी झाली होती. अन् लाचारी , फितुरी आणि हरामखोरी यांना स्वराज्यात जागा नव्हती. असं सारं घडलं तरच राष्ट्र उभं राहत असतं. फुलत असतं.

 

शिवकालात तसं पाहिलं तर रणांगणावर होणाऱ्या जखमांमुळे कण्हण्याचेच क्षण रोज आणि अखंड उठत होते। पण पोरं हसत हसत कण्हत होती. अभिमानानं कण्हत होती , अन् मग कोणी एखादा शाहीर डफावर थाप मारून गर्जत होता. ‘ मराठियांची पोरं आम्ही , भिणार नाही मरणाला

 

‘ अन् मग माझ्यासारख्या सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यात भिरभिरणाऱ्या गोंधळ्याला सुचू लागतं की , मऱ्हाठियांची पोरे आम्ही नाही भिणार मरणाला!

 

सांगुनि गेला कुणी मराठी शाहीर अवघ्या विश्वाला.

 

तीच आमुची जात शाहीरी मळवट भाळी भवानीचा.

 

पोत नाचवित आम्ही नाचतो. दिमाख आहे जबानीचा!

…. क्रमश.