शिवचरित्रमाला भाग २८

शिवचरित्रमाला भाग २८

त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.

उंबरखिंडीच्या मोहिमेत कारतलबखान उझबेग याची अगदी नाचक्की झाली. समृद्ध साहित्याने सुसज्ज असलेली फौज कमी सैन्यबळाच्या आणि तुटपुंज्या युद्धसाहित्याच्या शिवाजीराजापुढे का मार खाते आहे , याचा सूक्ष्म अभ्यास तर राहोच , पण साधा वरवरचा विचारही कोणत्याही मोगली सेनापतीने कधीच केला नाही.

सहज बोलतो , पाहा पटतं का! आजही आमचे कारखाने आजारी पडतात। कायमचे बंदही पडतात. तोट्यात तर नेहमीच असतात. घोटाळे आणि भानगडी यांच्या मनोरंजक कथांनी आमचे विनोदी वाङ्मय समृद्धही होत असते. असं का होतं ? या सर्व आमच्या पराभवाचं नातं कारतलबखान आणि शाहिस्तेखानसारख्या बेशिस्त अहंकारी , अभ्यासशून्य , कुचराईबाज , उपभोगवादी , निष्ठाहीन म्हणूनच पराभूत सेनापतींशी जुळलं आहे का ? तेच नातं आम्हाला उदात्त आणि उत्तुंग , विश्वकल्याणकारी म्हणूनच अनुकरणीय शिवाजीराजांशी जोडता येईल का ?

हीच वरील अवस्था आपल्याकडे प्रत्येक क्षेत्रांत आणि विषयांत अनुभवास येते आहे। आम्ही निखळ आनंदाने , एकजुटीने , शिस्तीने , अनुशासनाने खेळांच्या क्षेत्रात तरी वागायला नको का ? म्हणजे मग आम्हाला ऑलिम्पिकमध्ये एखादं तरी सोन्याचं पदक मिळेल की! या सर्व अपयशांच्या मुळाशी एकच कारण आहे. आम्हाला ‘ राष्ट्रीय ‘ चारित्र्यच नाही.

दिल्लीत औरंगजेब फार मोठ्या अपेक्षेने शाहिस्तेखानाच्या दक्षिण मोहिमेवर लक्ष ठेवून होता। पण ते त्याचं लक्ष केवळ आशाळभूत ठरलं. शाहिस्तेखानाला आता महाराष्ट्रात उतरून अडीच वर्षे झाली होती. खर्च अफाट आणि मिळकत जवळजवळ शून्यच. टोळधाडीप्रमाणे मराठी मुलखाला आणि मराठी संसारांना ओरबाडीत , कुरतडीत तो बसला होता. त्यामुळे त्याच्याबद्दल येथील जनतेत फक्त दहशतच होती.

महाराज उंबरखिंडींच्या युद्धानंतर दक्षिण कोकणात , राजापूरच्या रोखाने मोहिमेवर होते। स्वराज्याला विरोध करणाऱ्या स्वकीयांना उदार मनाने वागवून आपल्या ‘ ईश्वरी कार्यात ‘ सामील करून घेण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच असे. संपूर्ण शिवचरित्र अभ्यासताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती अशी स्वकीय विरोधकांना महाराज समजावून सांगून , कधी मायेनं तर कधी रागावून स्वराज्यात येण्याचा आग्रह करत होते. कुणी आले , कुणी नाही आले. जे आले त्यांचे कल्याण झालं. कीर्ती झाली. पण जे कडवा विरोध करीत राहिले , त्यांचा अखेर कठोर हातानं त्यांनी समाचार घेतला. पण त्यांचा पाडाव करण्यासाठी महाराजांनी स्वत:चीच शक्तिबुद्धी वापरली. त्यासाठी त्यांनी कोणाही शत्रूपक्षीय सत्ताधीशाची मदत घेतली नाही. उदाहरणार्थ , चंद्रराव मोऱ्यांचा अगदी दु:खी मनाने , निरुपायाने बिमोड केला. पण कोणा जंजिरेकर सिद्दीची , इंग्रजांची वा परकीय शक्तीची मदत घेतली नाही. अशीच उदाहरणे आणखी पाच तरी सांगता येतील. मी हे इथं एवढं आवर्जून का सांगतोय ? कारण पुढच्या इतिहासात काही पेशव्यांनी हीच भयंकर आत्मघातकी चूक अनेकदा केली. उदाहरणार्थ तुळाजी आंग्ऱ्यांचा पराभव आणि बंदोबस्त करण्याकरता नानासाहेब पेशव्यांनी इ. १७५५ मध्ये मुंबईच्या इंग्रजांशी मैत्री केली आणि आंग्ऱ्यांचा बिमोड केला. इंग्रजांनी सुवर्णदुर्गाच्या समुद्रात आंग्ऱ्यांचं म्हणजेच स्वराज्याच आरमार समुद्रात बुडविलं. फडफडणाऱ्या आमच्याच भगव्या झेंड्यांसह हे आमचं आरमार समुद्राच्या च्या तळाशी गेलं. परक्यांना आपल्या राष्ट्रव्यवहारात आपणहून आमंत्रण देणं हा केवढा आत्मघात! अशा खूप चुका पेशवाईत झाल्या. शेवटी परकीय शत्रूंनी आम्हालाच गिळून टाकलं.

अशा चुका चुकूनही होऊ नयेत यासाठी महाराज अखंड सावधान होते.

इथं एक गम्मत झाली. (इ. १६६१ मार्च) महाराज दक्षिण कोकणात दौडत असतानाच त्यांनी तानाजी मालुसरे या आपल्या काळजातल्या सौंगड्याला एक कामगिरी सांगितली. कोणती ? संगमेश्वर भागातील रस्ते दुरुस्त करण्याचे काम त्यांनी तानाजीला सांगितले. आता बघा! एवढा मोठा तालेवार , भीमासारखा हा योद्धा , त्यानं दु:शासनासारख्या शत्रूशी लढाया करायच्या की हातात कुदळ फावडं अन् घमेली घेऊन रस्ते दुरुस्त करायचे ? अन् तो मराठा मर्द तेही काम प्रेमानं अन् हौसेनं जीव लावून करतोय बघा! उन्हातान्हात. दिवसभर केवळ श्रमदानी पद्धतीने नव्हे! फोटू काढला की ठेवलं घमेलं खाली. मग हारतुरे. महाराजांना आणि त्यांच्या जिवलगांना नाटकं करणं कधी जमलंच नाही.

संगमेश्वरचे रस्ते दुरुस्तीचे काम करीत असतानाच तानाजीवर एकदा सुर्व्यांच्या आदिलशाही टोळ्यांनी सशस्त्र हल्ला चढविला. कुदळ फावडी टाकून तानाजीने आपल्या मावळ्यांसकट उलटा हल्ला केला. जय झाला. सुर्वे पळाले. पुन्हा रस्ते दुरुस्ती सुरू. खरोखर या सगळ्या मावळी स्वभावांचं मूळ कशात आहे ? ते शिवाजीराजांनी या सौंगड्यांना सहज शिकविलेल्या स्वराज्यधर्मात आहे. हे वेगळंच निरोगी अन् हौशी वेड राजांच्या सौंगड्यांना लागलं. त्यातून उगविलेलं पिक निरोगी अन् सकस उगवलं.
… क्रमश.