शिवचरित्रमाला भाग १२२

शिवचरित्रमाला भाग १२२

======================

राखावी बहुतांची अंतरे.

======================

आपल्याला नेहमीच कुतुहल वाटत असते , की एवढा मोठा हा लोकनेता आणि सिंहासनाधिश्वर छत्रपती राजा वागत कसा होता , बोलत कसा होता , एकूण स्वभावानेच कसा होता! राजा कधी थट्टा विनोद करीत असे का , की सतत गंभीर होता ? शिवाजी महाराजांच्याबद्दल एक मार्मिक विधान *श्रीसमर्थांनी केले आहे. ‘शिवरायांचे कैसे बोलणे , शिवरायाचे कैसे चालणे , शिवरायाचे सलगी देणे कैसे असे ?’* या प्रश्नार्थक वर्णनातच महाराजांचे व्यक्तिमत्त्व डोळ्यापुढे येते. महाराजांच्या चेहऱ्यावर सततच स्मितहास्य तरळत राही,असे त्यांना भेटलेल्या युरोपीय वकिलांनी आणि प्रवाशांनी नोंदवून ठेवले आहे. या त्यांच्या स्मितहास्यातच महाराजांचे लोकसंघटनेचे यश आणि वर्म स्पष्ट होते. त्यांच्या एकूणच प्रचंड आणि अत्यंत अवघड अशा उद्योगात लोकसंपर्काला आणि प्रसंगी समोरच्या विरोधकालाही जिंकून घेण्याचे बळ होते. स्मितहास्य ही त्यांच्या बिझनेस स्कील आणि मॅनेजमेंटमधली सर्वात मोठी इन्व्हेंस्टमेंट होती. मी हे इंग्लिश शब्द जाणूनबुजून वापरतो आहे. कारण ते आम्हा आजच्या पुरोगामी मंडळींना चटकन समजतात आणि अपील होतात !😊

 

महाराजांच्या या वागण्याबोलण्याबाबतची सर्वात पहिलीच नोंद अन् तीही पूर्ण विश्वसनीय अशी परमानंद नेवासकरांनी शिवभारतात करून ठेवली आहे. महाराज १५ – १६ वर्षाचे असतानाच त्यांनी सुरू केलेल्या स्वराज्यस्थापनेची चुळबूळ जागच्याजागीच मोडून काढण्यासाठी विजापूरच्या आदिलशाहने आपला एक बडा सरदार अंबाजी घोरपडे यांस सैन्यनिशी महाराजांविरुद्ध मावळात रवाना केले. वास्तविक घोरपडे सरदार आपले स्वकीय, पण महाराजांना धरावयास किंवा मारावयास किंवा निदान प्रचंड दमदाटी करावयास अन् गप्प बसवावयास आले होते. पण महाराजांनी त्यावेळी त्या छोट्याशा वयात सरदारसाहेबांशी भेट आणि मुलाखत घेऊन असे गोड भाषण केले आणि त्यांना पटवून दिले की , ‘आम्ही बादशाहांच्या विरुद्ध बंडाळी करीतच नाही. बेवारस पडलेल्या गडांचा आणि वाड्याघोड्यांचा नीट बंदोबस्त ठेवीत आहोत , तेही बादशाहांच्या हितासाठीच.‘

 

परमानंदांनी महाराजांची ही पहेली मुलाकात सविस्तर लिहून ठेवली असती , तर किती बरे झाले असते! पण त्यांनी या बाबतीत एवढेच लिहिले आहे की , एखादा गारुडी नागाला ज्याप्रमाणे भुलवतो , झुलवतो अन् सफाईने परतवून लावतो , त्याचपद्धतीने मोठ्या कुशलतेने महाराजांनी घोरपड्यांना विनासंघर्ष , गोड बोलून परतविले. हे प्रकरण प्रत्यक्ष महाराजांच्याच तोंडून वदललेल , परमानंदाने नोंदविले आहे.

 

आपल्या देशात अनेक संप्रदाय , पंथ-उपपंथ पूवीर्पासूनच अस्तित्त्वात आहेत. बरोबरीने जवळपास सन् ७११ मध्ये बाहेरुन आलेले आक्रमणकारी व नंतर व्यापारी बनुन आलेले परधर्मीय सुद्धा होतेच.

असे अनेक आणखी काही पंथ सांप्रदाय आपल्या सर्व भेद पोटभेदांसह शिवकाळातही नांदत होते. त्यात अनेकांची प्रार्थनास्थळे आणि मठआखाडे इत्यादीही अस्तित्त्वात होते. पण शिवकालीन कागदपत्रांचा जास्तीतजास्त खोलवर अभ्यास करीत असतानाही वरील विविध भक्तीमार्गीयांच्यात जातीय दंगेधोपे आणि त्यातून रयतेचे होऊ शकणारे नुकसान कधीही घडलेले दिसून येत नाही. सर्वधर्मसमभावाची घोषणा न करताही हिंदवी स्वराज्याचे आचरण समभावी होते. सर्वांचे आचार , सणसमारंभ , उत्सव , मिरवणुका , यात्रा- जत्रा आनंदात चालत होत्या. या उलट सुलतानी राज्यात सत्ताधीश भेदभावाने आणि अन्याय अत्याचाराने वागल्याचे असंख्य पुरावे मिळतात. हिंदूंवर झिजीया कर लावण्यात आल्याचे आपणास ठाव आहेच. औरंगजेबाने सतनामी गोसाव्यांवर जसे अत्याचार केल्याच्या नोंदी आहेत. हिंदु धर्मियांची पवित्र देवस्थाने, मंदिरे पाडल्याची एक मोठी यादीच आहे.

 

जरा विषयांतर करून एक गोष्ट नमूद कराविशी वाटते की औरंगजेब स्वत: कठोर धर्मव्रती होता. मुर्तीभंजनाच्याबाबतीत तर तो फार आग्रही होता. ‘बना कदेर् मस्जिद तबा कर कुनिष्त ‘ असे औरंगजेबाचे शिलालेख सापडले आहेत. याचा अर्थ असा , मूर्ती नष्ट करून येथे मशिद तयार केली , असा आहे. बिदर (कर्नाटक) येथे श्रीनृसिंहाचे मंदिरभंग करून त्यावर कोरलेला त्याचा शिलालेख आजही अस्तित्त्वात आहे. त्याचे इतरही धर्मवेड प्रकार ऐतिहासिक पुराव्यांत उपलब्ध आहेत.

 

पण या सर्व पार्श्वभूमीवर हिंदवी स्वराज्यातील सर्वधर्मांबाबतची आस्था , आदर आणि आचरण उठून दिसते.

जाता जाता हेही सांगून टाकूया का ? त्यात शिवाजी महाराजांची सनातन हिंदु संस्कृती दिसते.

औरंगजेब आणि अन्य दक्षिणी बादशाही घराणी आणि या सर्वांचे सरदार दरकदार यांना शिवाजीमहाराजांनी लिहिलेली काही पत्रे आज उपलब्ध आहेत. त्यात महाराजांनी या सर्व शाही मंडळींना बहुमानार्थी विशेषणांनी संबोधिले आहे. पण त्यांच्यासंबंधात महाराजांनी अन्य कोणालाही लिहिलेल्या पत्रात त्यांनी या शाही मंडळींना बहुमानानेच उल्लेखिले आहे. औरंगजेबाचाही उल्लेख ते तसाच करताना दिसतात. महाराजांची संस्कृती आणि सभ्यता राजकुलीन होती आणि हीच या भारताची आणि इथल्या मातीची ओळख होती, आहे आणि राहीलही.

 

… क्रमश.