शिवचरित्रमाला भाग १२५

शिवचरित्रमाला भाग १२५

======================

अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.

======================

हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. ते हळूहळू वाढतही गेले. शिवाजीमहाराजांना इतरेजन मात्र बंडखोर समजत होते. प्रस्थापित बादशाहांच्या विरुद्ध बंडाळी करून निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याला दख्खनी पातशाहीतील लोक आणि दिल्लीच्या मोगलाईतील लोक सार्वभौमत्त्वाचा मान देत नव्हते. इतकेच नव्हे , तर आमच्यातीलही बरेच स्वजन महाराजांना राज्यकर्ता समजत होते. त्यांना राजा मानत नव्हते. *तो सार्वभौमत्वाचा साक्षात्कार जनतेला होण्याची नितांत आवश्यकता असते.*

 

*आमची भूमी , आमचा ध्वज , आमचे पंतप्रधान , आमची संसद , आमचे आरमार , आमचा समुद आणि आमचे राष्ट्रपती याच्यापुढे जगातील सर्व गोष्टी आम्हाला दुय्यम आहेत , असल्या पाहिजेत. त्यांची अप्रतिष्ठा होता कामा नये. ती प्रतिष्ठा प्रथम आम्हीच सांभाळली पाहिजे. ती पोस्टाच्या तिकिटावरच्या चित्रापासूनच ते संसदेवर फडकणाऱ्या राष्ट्रध्वजापर्यंत आमच्या हृदयांत , आमची आम्हालाच उदात्ततेने जाणवली पाहिजे.* कधीकधी लहानमोठ्या अशा घटना घडतात , की या उदात्ततेला धक्का बसतो. आपल्या मनातही सुरुंगासारखा स्फोट होतो. नुकतेच घडले. एका शेजारच्या राष्ट्राचे अध्यक्ष आमच्या देशात पाहुणे म्हणून आले. त्यांचे अगदी योग्य असे आम्ही स्वागतही केले. पण ते ज्या विमानातून आले , त्या विमानावर जो आमचा राष्ट्रध्वज लावलेला होता , तो उलटा लावला गेला होता.

 

आणखी एक आठवण. पण जरा वेगळी. पंडित नेहरुंच्या काळात एका युरोपीय देशात , जगातील सर्व राष्ट्रांत जे कोणचे अतिशय उदात्त , भावनेने भारावलेले राष्ट्रीय गीत (राष्ट्रगीत नव्हे) तेथील जनता प्रेमाने गाते , अशी एकूणएक राष्ट्रप्रेमी गीते एकत्र करून त्यांची भाषांतरे छापण्याचा उपक्रम त्या युरोपीय राष्ट्राने योजला. त्या राष्ट्रात असलेल्या आमच्या राजदूताकडेही अशा अखिल भारतीय पातळीवर लोकादरांस आणि प्रेमास पात्र ठरलेले राष्ट्रविषयक गीत त्या युरोपीय राष्ट्राने मागितले. आमच्या राजदूताने कोणचे गीत दिले ? आमच्या राजदूताने एका हिंदी सिनेमातील एक प्रेमगीत पाठवून दिले! आता ही सगळीच कहाणी दळत बसायची का ? जाऊ द्या. पण असे का होते ? कारण आमचे मनच ‘ स्वदेशी’ झालेले नाही.

 

शिवाजी महाराज लहानसान गोष्टीतही स्वराज्याची अस्मिता आणि प्रतिष्ठा कसे जपत होते याचे द्योतक असलेले महाराजांचेच एक पत्र उपलब्ध आहे. गोवळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशहा बादशाहास भेटावयास महाराज जाणार होते. ही भेट राजकीय होती. आजच्या भाषेत बोलायचे तर राष्ट्रीय पातळीवरची होती. म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम छत्रपती महाराज गोवळकोंड्याच्या बादशाहाला भेटावयास जाणार होते. तेव्हा ‘आम्ही बादशाहांस भेटावयास कोणत्या पद्धतीने येऊ ‘ हे महाराजांनी आपल्या मराठी राजदूताच्यामार्फत गोवळकोंड्याच्या वजीरांस आणि बादशाहास स्पष्ट शब्दांत कळविले आहे. महाराजांच्या राजदूताचे नाव होते प्रल्हाद निराजी नासिककर. महाराज म्हणतात की , *‘आम्ही बादशाहांस भेटावयास येऊ , त्यावेळी आमची ₹सर्व राजचिन्हे आमच्या समवेत भेटीचे वेळी असतील ‘ छत्र , मोचेर्ले , सोन्याच्या मुठीच्या चवऱ्या , ध्वज , माहिमरातब , गुर्ज (राजदंड) इत्यादी सर्व राजचिन्हे समवेत आणि धारण करून आम्ही येऊ. शाही नौबत (छत्रपतींची राजदुंदुभी) , निरंकुश स्वारीचा हत्ती त्यात असेल.*

 

हे सर्व सुचविण्यात आणि त्याप्रमाणे घडविण्यात महाराजांचा कोणता हेतू होता ? बडेजावाने मिरविण्याचा आणि आपला डामडौली दिमाख करून गोवळकोंडेकरांना दिपविण्याचा किंवा हिणविण्याचा होता का ? अजिबात नाही. पण एक सार्वभौम स्वतंत्र महाराजा आपल्या राष्ट्राच्या वतीने तुमच्याकडे भेटीस येत आहे याची जाणीव त्यांना आणि आपल्यातील आंधळ्या सुजनांनाही देण्याकरता हा रिवाज महाराज जाणीवपूर्वक आचरीत होते. जगातील सर्वच सार्वभौम देश हा रिवाज पाळतात. आमचे हिंदवी स्वराज्य नव्यानेच जन्माला आलेले असल्यामुळे आम्हाला जाणीव नव्हती , ती देण्याची अशी गरज होती , इतकेच. पण त्याला केवढा अर्थ आहे. महाराजांची आणि कुतुबशाहाची भेट अशाच पद्धतीने घडली.

 

पुढची एक आठवण सांगावीशी वाटते. श्रीमंत थोरले बाजीराव हे दिल्लीकरांचा मुलुख जिंकत जिंकत चंबळा नदी ओलांडूनही पुढे गेले. पण दिल्लीच्या बादशाहाच्या बाबतीत त्यांच्या भावना जरा उणेपणानेच व्यक्त झाल्या.

 

आणखी एक गोष्ट सांगून टाकू काय ? पाहा कशी वाटते. इ.स. १९५२ साली ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ ( द्वितीय) यांचा राज्याभिषेक सोहळा लंडनमध्ये साजरा झाला. त्यावेळी भारत सार्वभौमच होता. पण कॉमनवेल्थचा सदस्य होता. जगातील अनेक देश कॉमनवेल्थचे सदस्य नव्हते , तरीही जागतिक रिवाजाप्रमाणे ब्रिटिश राणीचा आदर आणि अभिनंदन करण्यासाठी प्रतिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. भारताच्या वतीनेही भारताचे राजदूत (हायकमिशनर) उपस्थित होते. रिवाजाप्रमाणे राणीला काही मौल्यवान आहेर करणे आवश्यक आणि योग्यच होते. पण तो आहेर कसा असावा आणि काय असावा याचा विचार आमच्या देशाने म्हणजेच परराष्ट्र खात्याने आणि परराष्ट्रमंत्र्यांनी करण्याची आवश्यकता होती. पण तसा केला गेला नाही. आमच्या भारताच्या राजदूताने राणीला गुलाब फुलांचे छत्र अर्पण केले. काय बोलावे ?

 

हिऱ्यामोत्यांची भरलेली सोन्याची परात एकवेळ आहेर म्हणून राणीला दिली असती , तरी चालले असते. पण सार्वभौमत्वाचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे छत्र. ते द्यावयास नको होते. पाहा पटते का!

आणखीन एक. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षासाठी असलेल्या स्पेशल विमानाची एअरफोर्स-1 ची तारीफ आम्ही मोठ्या चवीने करतो, त्यात आम्हाला मोठेपणा ही वाटतो, पण तसा विचार आमच्या राष्ट्रप्रमुखाने कधी केल्यास आमची काय प्रतिक्रिया असेल ?

असो.

आपल्या राष्ट्राच्या अस्मितेला थोडासुद्धा धक्का लागता कामा नये , याची दक्षता सर्वांनीच अगदी परदेशांत प्रवासाकरता किंवा विद्यार्थी म्हणून अभ्यासाकरता जाणाऱ्या प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता असते. राष्ट्रीय चारित्र्याला त्यातूनच उजाळा मिळतो. नम्रता असावी. लाचारी नसावी.

 

… क्रमश….