शिवचरित्रमाला भाग ९७

शिवचरित्रमाला भाग ९७

======================

महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र

======================

महाराजांच्या जीवनातील अनेक घटना आणि मोहिमा यांचा वेग इतका विलक्षण दिसतो की , अशा प्रकरणांना नाव काय द्यावे ? त्याला पुन्हा तेच नाव द्यावेसे वाटते ‘ आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे ‘ खरं म्हणजे महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र हे पर्यायी नाव झाले.

 

मोगलांविरुद्ध महाराजांनी सिंहगड मिळवून मोहिम सुरू केली. दि. ४ फेब्रुवारी १६७० अन् लगेच मराठी सैन्याचे क्षेपणास्त्र सुटले. पुरंदरच्या पराभवी तहाच्या या क्षेपणास्त्राने ठिकऱ्या उडविल्या. औरंगजेबाला दिलेले सर्व किल्ले महाराजांनी परत जिंकले. त्यांनी स्वत: जिंकलेला किल्ला कर्नाळा. दि. २२ जून १६७० म्हणजे चार फेब्रुवारी ते २२ जून अवघ्या पाच महिन्यात हा प्रचंड झपाटा शिवसैन्याने दाखवला. पावसाळा सुरू झाला. लढणारे सैन्य शेतात राबू लागले. ऑक्टोबर १६७० प्रारंभी म्हणजेच दसऱ्याला मोहिमा पुन्हा शिलंगणाला निघाल्या. पंधरा हजारा स्वारांची फौज कल्याणहून सुरतेच्या रोखानं रोरावत निघाली आणि ऐन दिवाळीत मराठी फौज सुरतेत शिरली. सुरत स्वारीची ही दुसरी आवृत्ती दिवाळीच्या प्रकाशात प्रसिद्ध होत होती. मात्र पहिल्या सुरत स्वारीपेक्षा (इ. स. १६६४ जानेवारी) ही दुसरी स्वारी लढायांनी गाजली.

 

सर्व प्रतिकारांना तोंड देतदेत सुरतेची सफाई मराठे करीत होते. नेहमीप्रमाणे इंग्रजांनी आपल्या वखारींचे रक्षण केले. मराठ्यांची इंग्रजांची गोळाबारी चालूच होती. तरीही इंग्रज वाकेनात. पण आपण फार हट्टाला पेटलो तर मराठे आपला सर्वनाश करतील हे इंग्रजांच्या लक्षात आले. त्यांचा प्रमुख स्ट्रीनशॅम मास्टर याने नमते घेऊन आपला वकील नजराण्यासह महाराजांकडे पाठविला. या नजराण्यात उत्कृष्ट तलवारी आणि मौल्यवान कापडही होते. महाराज एवढ्याने सुखावणार नव्हते. पण अधिक वेळ व आपली अधिक माणसे खर्ची घालून आत्तातरी इंग्रजांकडून अधिक फारसे मिळणार नाही , फक्त जय मिळेल हे लक्षात घेऊन महाराजांनी इंग्रजांशी चाललेले रणांगण थांबविले. मुख्य कारण म्हणजे महाराजांना झपाट्याने सुरतेहून निघून जाणे जरुरीचे होते. नाहीतर मोगलांच्या फौजा जर आल्या , तर संपत्तीच्याऐवजी जबर संघर्षच समोर उभा राहील. मूळ हेतू सफळ होणार नाही हे लक्षात घेऊन महाराज थांबले. सुरतेतली संपत्ती (नक्की आकडा सांगता येत नाही) घेऊन महाराजांनी नासिकच्या दिशेने कूच केले. ही दिवाळी आनंदाची आणि सुख समृद्धीची झाली.

 

पूर्वी महाराज सुरतेवर येऊन गेले होते हे लक्षात असूनही औरंगजेबाने सुरतेच्या संरक्षणाची विशेष व्यवस्था केलेली नव्हती. सावध होते आणि कडवेपणाने वागले ते इंग्रजच. या त्यांच्या कडवेपणाचा परिणाम म्हणजे , याच सुरतेचे ते पंच्याऐंशी वर्षांनी म्हणजे इ. स. १७५६ मध्ये सत्ताधारी पूर्ण मालक बनले. सुरतेचा इंग्रज अधिकारी स्ट्रीनशॅम मास्टर हा जेव्हा इंग्लंडला परत गेला. तेव्हा लंडनमध्ये त्याचा ‘राष्ट्राची प्रतिष्ठा वाढविणारा शूर नेता’ म्हणून सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला.

 

त्या सीवाने दुसऱ्यांदा आपली सुरत बदसुरत केली याचा राग औरंगजेबाला आलाच. तहात मिळविलेले सर्व किल्ले आणि मुलुख सीवाने घेतलेच होते. आता सुरतेत आपली त्याने बेअब्रुही केली याचा हिशेब औरंगजेबाच्या डोळ्यापुढे उभा राहिला होता. आग्ऱ्यात आपण त्याच्याशी ज्या पद्धतीने वागलो , त्याचे अपमान केले , त्याला कैदेत टाकले , त्याला ठार मारण्याचे बेत केले त्याचा हा सीवाने घेतलेला सूड होता हे औरंगजेबाच्या लक्षात आले.

 

शाही वाढदिवसाच्यादिवशी सीवाने अर्पण केलेला सोन्याच्या मोहरांचा नजराणा आणि केलेले मुजरे औरंगजेबाला फार फार महागात पडले.

 

महाराज सुरतेच्या संपत्तीसह व फौजेसह बागलाणात (नासिक जिल्हा , उत्तर भाग) पोहोचले. सुरतेवरच्या या दुसऱ्या छाप्याची बातमी औरंगाबाद , बुऱ्हाणपूर , अहमदाबाद इत्यादी ठिकाणी पोहोचली होती. बुऱ्हाणपुराहून दाऊदखान कुरेशी झपाट्याने महाराजांना अडविण्यासाठी निघाला आणि त्याने वणी दिंडोरीच्या जवळ महाराजांना रात्रीच्या अंधारात गाठले. ही कातिर्की पौणिर्मेची रात्र होती. दि. १६ ऑक्टोबर १६७० . भयंकर युद्ध पेटले. दाऊदखान , इकलासखान , रायमकरंद , संग्रामखान घोरी , इत्यादी नामवंत मोगली सरदार महाराजांवर तुटून पडले होते. आणलेली संपत्ती सुखरूप सांभाळून आलेला हा प्रचंड हल्ला फोडून काढण्याचा महाराजांचा अवघड डाव , साऱ्या मराठ्यांनी एकवटून यशस्वी केला. रात्रीपासून संपूर्ण दिवस ( दि. १७ ऑक्टोबर) हे भयंकर रणकंदन चालू होते. अनंत हातांची ती वणीची सप्तश्रृंग भवानी जणू मराठ्यांच्या अनंत हातात प्रवेशली होती. मोगली सैन्याचा प्रचंड पराभव झाला. महाराज स्वत: रणांगणात झुंजत होते. कातिर्केच्या पौणिर्मेसारखंच महाराजांना धवल यश मिळाले. मोगलांचा हा प्रचंड पराभव होता. आपल्या हे लक्षात आलं ना , की ही लढाई मोकळ्या मैदानावर झाली. गनिमी काव्याच्या छुप्या छाप्यांच्याही पलिकडे जाऊन मोकळ्या मैदानात अन् रात्रीच्या अंधारातही महाराज अन् मावळे झुंजले अन् फत्ते पावले.

 

… क्रमश.