झुंज भाग 6

झुंज : भाग ६

खान यावेळेस मात्र कोणतीही घाई करण्याच्या मनस्थितीत नव्हता. तसेच तो कोणत्याही परिस्थितीत किल्लेदाराला हलक्यात घेणार नव्हता. तसेही जो किल्लेदार आपल्या माणसांना साधी जखमही होऊ न देता एक हजाराची फौज परतवून लावू शकतो त्याच्या कल्पकतेला दाद देणे खानाला क्रमप्राप्तच होते. हाच विचार करत गेल्या १५ दिवसांपासून खान नीट झोपू देखील शकला नव्हता.

“हुजूर…” द्वारपालाचा आवाज आला आणि खानाची तंद्री भंग पावली… त्याने एकवार हुजऱ्याकडे पाहिले. तो खाली मान घालून उभा होता.

“आ गये सब?” खानाने विचारले.

“जी हुजूर…”

“अंदर भेजो…” हुजऱ्याला आज्ञा देत खान आपल्या जागेवर जाऊन बसला. काही वेळातच ७/८ जण खानाच्या शामियान्यात शिरले.

“बैठो…!!!” खानाचा हुकुम होताच प्रत्येक जण आपापल्या मानाप्रमाणे आसनस्थ झाला.

“करीमखान… इससे पेहेले हमे शिकस्त क्यो झेलनी पडी?” खानाने एकदम मुद्द्यालाच हात घातला.

“सरदार… मुझे इसकी सिर्फ एक वजह दिखती है… हमारी फौज सिर्फ एक तरफ थी…” काहीसे बिचकत करीमखान उत्तरला.

“बराबर…! लेकीन आज हम वो गलती नही करेंगे… आज शामतक किलेपर अपना चांदसितारा फडकेगा…” खान आढ्यतेने म्हणाला आणि सगळ्यांनी त्याच्या सुरात सूर मिसळला.

“करीमखान… तुम चारसौ लोग लेकर सामनेसे जाओगे… दौलतखान… तुम पाचसौ लोग लेकर पिछेसे हमला करोगे… देशमुख… तुम जंगलकी तरफसे पाचसौ सिपाई लेकर हमला करोगे और नाईक पाचसौ सिपाई लेकर जंगलकी दुसरी तरफसे हमला करेगा… एक बात सबको याद रखनी है… हर एक सिपाई दो तीन गज की दुरी बनाकर ही आगे बढेंगे.” खानाने आपली योजना सांगितली.

“बहोत बढीया सरदार… आज शाम या तो किलेदार आपके सामने होगा या उसका सर…” करीमखान म्हणाला आणि बाहेर पडला. त्याच बरोबर इतर सर्वजण देखील बाहेर पडले.

किल्ल्याच्या तटावरून पाहणी करणाऱ्या किल्लेदाराला आज खानाच्या फौजेमध्ये जरा जास्तच हालचाल दिसत होती. त्याचाच अर्थ आजच पुन्हा आपल्यावर आक्रमण होणार हे त्याने ओळखले. पण एक गोष्ट मात्र त्याला विचार करायला भाग पाडत होती. आणि ती म्हणजे त्याला कोणत्याही बाजूला खानाची फौज एकवटलेली दिसत नव्हती. याचाच अर्थ खानाने यावेळेस आक्रमण करण्यासाठी नवीन योजना आखली होती. एकाएकी त्याच्या मनात विचार आला. नक्कीच आपल्या किल्ल्यावर चहुबाजूने हल्ला करण्याचा खानाचा विचार असणार. पाहता पाहता किल्लेदार गंभीर झाला. कारण मोठ्या संख्येने जर चहुबाजूने आक्रमण झाले तर मात्र आपला निभाव लागणे कठीण आहे हे त्याने जाणले.

काही वेळातच मुगल सैन्याने चारही बाजूंनी डोंगर चढायला सुरुवात केली. यावेळेस सैन्य जास्तच होते, तसेच ते विखुरलेले होते. प्रत्येक सैनिक हा एकमेकांपासून बरेच अंतर राखून वर चढत होता. आता जर किल्ल्यावरून दगड लोटले तरीही ते चुकवणे त्यांना शक्य होणार होते आणि हाच सगळ्यात मोठा धोका किल्लेदाराने ओळखला.
क्रमशः