झुंज : भाग १९

झुंज : भाग १९

 

दोघेही सरदार जसे रामशेज जवळ पोहोचले त्यांना किल्ल्याच्या चहुबाजूला मुगल सैन्य दिसत होते. काहीशा दुरूनच त्यांनी कुठे वेढा कमजोर पडला आहे हा याची पाहणी केली. पण यावेळेस त्यांना वेढ्यात कुठेही थोडीही ढिलाई दिसली नाही. त्यातून मुगल फौज संख्येने इतकी जास्त होती की त्यांच्याशी समोरासमोर लढाई करणे म्हणजे स्वतःहून आत्महत्या करण्यासारखे होते. अर्थात एरवी त्यांनी याही गोष्टीला मागेपुढे पाहिले नसते पण राजांचा हुकुम होता. त्यांच्या हातात वाट पाहण्याखेरीज काहीच नव्हते. तरीही एक दोन वेळेस सरदार रुपाजींनी आपल्या काही निवडक स्वरांना घेऊन वेढा तोडण्याचा प्रयत्न केलाच. पण त्यात त्यांना यश येऊ शकले नाही.

गडावरील रसद मात्र दिवसेंदिवस संपत होती. जास्तीत जास्त १५ दिवस पुरेल इतकेच धान्य गडावर होते. किल्लेदाराच्या चेहऱ्यावर उमटणारी चिंता त्याच्या बायकोला दिसत होती पण ती तरी काय करणार?

तीन दिवस असेच गेले आणि किल्लेदाराने परत एकदा सभा बोलावली.

“गड्यांनो… तीन वर्स झालं… आपन किल्ला झुंजवला. बादशानं सरदार बदलले पन आपन हार मानली नाई. पर आता ह्यो सरदार येगळाच हाये. निस्ता येढा दिवून बसून ऱ्हायला. आपन त्याच्यासंग टक्कर घ्यायची तर आपन फक्त ५०० आन त्ये २५०००. आपन खाली उतरलो तर हकनाक मरनार. नाय गेलो तर उपासमारी. तुमाला काय वाटतं? आपन काय कराया पायजेल?” त्याने सगळ्यांपुढे प्रश्न टाकला.

“किल्लेदार… ज्ये काय व्हयाचं त्ये हु दे… पर आपन माघार घ्यायची नाई.” एक तरुण पुढे येत उत्तरला.

“हा किल्लेदार…” इतरांनी देखील त्याच्या सुरात सूर मिसळला. तात्या मात्र यावेळेस गप्पच होता. किल्लेदाराने त्याच्याकडे पाहिले.

“तात्या… काय झालं?” किल्लेदाराने प्रश्न केला.

“मनात येक इचार आला…” तात्या अनवधानानं बोलून गेला.

“कसला?” किल्लेदाराने विचारले.

“आपन येक काम करू शकतो… आपल्याकडं १५ दिसांची रसद हाये. पन आपण एकाच वक्ताला जेवन घ्येतलं तर ती रसद आपल्याला २५ दिस पूरंल.” त्याने आपला विचार बोलून दाखवला.

“तात्या… दोन दिस एका वक्ताला खानं येगळं. पन आपलं समदं पोटावर चालतं. बरं आपन निभाऊन निऊ पन आपल्या संग बायकापोरं बी हायेत…” किल्लेदार उत्तरला. आणि तात्या शांत बसला. शेवटी एकभुक्त राहणे एक दोन दिवस ठीक पण त्यानंतर माणसातील शक्ती क्षीण होत जाते हे किल्लेदार चांगलेच जाणून होता. शेवटी काही गोष्टी ह्या दैवाधीन बनतात. ही गोष्टही आता त्याच बाजूला झुकत चालली होती. किल्ल्यावरील कित्येक स्त्रियांनी तर देवाधर्माचे नाव घेऊन उपास करायला सुरुवात केली. किल्लेदाराला देखील हे समजत होते पण त्याचा नाईलाज होता.

जवळपास १० दिवस झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील तेज दिवसेंदिवस कमी होत होते. चेहरे कोमेजले होते. देवाचा धावा करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरी कोणतीच गोष्ट उरली नव्हती.

खानालाही गडावरील हालचाली मंद झालेल्या जाणवल्या आणि तो मनातून सुखावला. त्याचा उत्साह वाढला. त्याने वेढा अजूनच कडक केला. जी गोष्ट या पूर्वीच्या सरदारांना जमली नाही ती गोष्ट आपण कमीतकमी लोकं गमावून मिळवणार आहोत याची त्याला जणू खात्रीच पटली. अजून काही दिवस आणि गड काहीही न करता आपल्या ताब्यात येणार ही गोष्टच त्याला खूप सुखदायक वाटत होती.

गडावरील लोकं वेगवेगळ्या देवाचा धावा करत होते आणि त्यांची हाक देवाने ऐकली. उन्हाचा कडाका कमी होऊन पावसाळ्याला सुरुवात झाली. तसेही नाशिक भागातील पाऊस तो. एकदा सुरु झाल्यावर कित्येक वेळेस तर तीन तीन दिवस उघडत नाही. जसा पाऊस सुरु झाला तसे रुपाजी आणि मानोजी यांचे चेहरे खुलले. याच पावसाचा आधार घेऊन आपण आपली कामगिरी फत्ते करावी याची त्यांनी मनात खुणगाठ बांधली.

तीन दिवस सलग पाऊस चालू असल्यामुळे मुगल सेनेची पुरती त्रेधातिरपिट उडाली. सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले. दोन तीन वर्षांपासून सारखे युद्ध चालू असल्यामुळे आणि त्यात अनेकांनी आपले प्राण गमावल्यामुळे कित्येक मृतदेह तसेच पडले होते. पावसामुळे ते सडले आणि त्याची दुर्गंधी पूर्ण परिसरात पसरली. तो वास इतका त्रीव्र होता की कित्येकांना तिथे श्वास घेणे दुरापास्त होऊ लागले. कित्येक जण त्यामुळे होणाऱ्या रोगाला बळी पडले. याचा परिणाम असा झाला की दोन दिवस खानाला वेढ्यामध्ये ढील द्यावी लागली. जंगलाकडील भागातील लोकं दोन दिवसांसाठी तिथून बाजूला झाले आणि मराठा सैन्याला जागा मिळाली.

तो दुर्गंधीयुक्त परिसर तुडवत प्रत्येकाने गडाची वाट धरली. सगळ्यात पुढे दोन्ही मराठे सरदार होते. पाऊस काहीसा उघडला म्हणून किल्लेदार पाहणीला निघाला होता. त्याला दोन्ही सरदार गडाच्या दिशेने येताना दिसले. खानाने नवीन डाव टाकला असा समज करून त्याने आपल्या साथीदारांना बोलावले. भुकेने अर्धमेल्या झालेल्या लोकांमध्ये युद्धाचे नांव ऐकताच चैतन्य फुलले. तटाभोवती मोठमोठे दगड ठेवले गेले आणि आता फक्त किल्लेदाराची आज्ञा होण्याची ते वाट पाहू लागले.

दोन्ही सरदार अजून काहीसे जवळ आले आणि किल्लेदाराने त्यांना ओळखले. त्यांच्या बरोबर संभाजी महाराजांचे निशाण होते. सैन्य तुकडीच्या मागे किल्ल्यासाठी रसद असलेल्या गाड्या होत्या. आपल्याला मदत आली आहे हे किल्लेदाराने ओळखले. पण खात्री करून घेणेही तितकेच गरजेचे होते.
दोन्ही सरदार किल्ल्याच्या दरवाज्यात येताच किल्ल्याच्या दरवाज्याची झडप उघडली गेली.

“कोन हाये?” दाराच्या झडपेमधून डोकावलेल्या माणसाने प्रश्न केला.

“म्या सरदार रुपाजी भोसले आन ह्ये सरदार मानोजी मोरे… राजांनी रसद पाठविली हाये…” रुपाजींनी उत्तर दिले. झडपेतून बाहेर आलेले डोके बाजूला झाले. काही वेळ गेला आणि परत ती व्यक्ती दिसू लागली.

“खून दावा आदी…” त्याने फर्मान सोडले. एरवी एवढे मोठे सरदार दारात उभे आहेत म्हटल्यावर त्याने धावत जाऊन दरवाजे उघडले असते. पण यावेळेस परिस्थिती आणीबाणीची होती. कुणावरही पटकन विश्वास ठेवणे धोक्याचे होते.

“ही पहा…” मनोजींनी खुणेची मुद्रा बाहेर काढली. त्याकडे त्याने एकदा निरखून पाहिले आणि मग तत्काळ दरवाजा उघडला गेला. स्वतः किल्लेदाराने दोन्ही सरदारांचे स्वागत केले. रुपाजींनी किल्लेदाराला महाराजांचा निरोप कळवला. किल्लेदाराच्या अंगावर मुठभर मांस चढले.

कामगिरी फत्ते करून दोन्ही सरदार परत फिरले. जेव्हा पाऊस उघडला तेंव्हा खानाने परत वेढा कडक केला. पण त्याला गडावरील हालचाली वाढल्याचे जाणवले. महाराजांचा जयघोष ऐकू येऊ लागला. आता मात्र खान कोड्यात पडला. अगदी क्षीण झालेल्या मराठ्यांमध्ये एकदम इतका जोष आलेला पाहून त्याचे डोके ठणकले. आणि त्याला दोन दिवस वेढा उठविल्याची आठवण झाली. त्याने डोक्यावर हात मारून घेतला. शेवटी त्याने बादशहाला पत्र पाठवून सगळी परिस्थिती सांगून वेढा उठविण्याची परवानगी मागितली. अगदी नाईलाजाने बादशाहने ती परवानगी दिली आणि जवळपास साडेतीन वर्षांनी रामशेजचा वेढा उठला.

क्रमशः